Saturday, February 9, 2019

हरवू नकोस!!


तू छावा आहे सिंहाचा;
कळपात मेंढरांच्या हरवू नकोस,

तू जन्म घेतला मानवाचा;
निर्मनुष्य होवूनी मरु नकोस,

हा खेळ असे जरी संचितांचा;
दंभात अस्तित्व हरवू नकोस।

यत्नातूनच होते यश साकार,
युयुत्सु वृत्ति टाकू नकोस।

वंशज तू अगस्त्यमुनींचा,
वेदनांच्या सागरासमोर क्षीण बनू नकोस।

वंद्य वाल्मीकिंचा तू अभ्यासक,
घात जरी झाला शस्राने;
तरी शास्त्र कधी टाकू नकोस।

आस्तिकाचे नुकसानच भारी,
म्हणून नास्तिकाचा नाद धरु नकोस।

येईल कधी चीड़ आप्त-स्वकियांचीच,
तरीही स्वधर्मा कधी त्यागू नकोस।

असे अंश तू चैतन्याचा;तैसेचि जगी सर्व,
अतः कुणास हीन गणू नकोस।

कुणी दुष्कर्मात माहीर;
तर कुणी सत्कर्मास आतुर,
"भाग्य लिहिले जाते कर्मानेच"
हे अलिखित; कधी विसरु नकोस।

अतीव रोचक महाभारत;
म्हणून गीता कधीही वगळू नकोस।
अर्जुनाच्या रुपात तूच होता;
हे तर्क लावूनही नाकारू नकोस।

तू छावा आहे सिंहाचा,
कळपात मेंढरांच्या हरवू नकोस।।


- चेतन कोठावदे